परम पूज्य सद्गुरू माऊली स्वामी स्वरूप स्वानंद जी यांस मनोभावे वंदन आणि सर्वांना नमस्कार.
(मूळ श्लोकात थोडासा बदल करून)
"नमो ब्रह्मण्यदेवाय, सनातनवेदहिताय च। ". असेच परमपूज्य गुरुमाऊलींचे स्वरूप, मला आणि शुभांगी ताईंना काल अनुभवायला मिळाले!!
काल खूप सुंदर असा योग जुळून आला होता. आमच्या घरचे गेली पंधरा वर्षे पुरोहित असलेले गुरुजी - वेदमूर्ती श्री मंगेश बावीकर यांनी, काल सोहम भुवन येथे येऊन स्वामीजींची भेट घेतली आणि मनमोकळी चर्चाही केली.
गुरुजींची सासवड येथे स्वतःची वेदपाठशाळा आहे. तेथे वीस मुले शिकत आहेत. गुरुजी कुठल्याही अपेक्षेशिवाय, निष्कामपणे विद्यादानाचे हे व्रत, गेली आठ वर्षे सांभाळत आहेत. तेथे दाखल झालेल्या मुलांना, वैदिक यजुर्वेदीय शिक्षणाबरोबरच, लौकिक व्यवहारातील शालेय शिक्षण ही दिले जाते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास होईल; याची काळजी घेऊन त्याप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेस शिकवले जातात. त्या संदर्भात एका कामासाठी त्यांना स्वामीजींना भेटून मार्गदर्शन घ्यायचे होते.
बावीकर गुरुजी, त्यांच्या पत्नी मधुराताई आणि मुले-शुचिव्रत व देवव्रत; तसेच पाठशाळेतील शिक्षक गुरुजी श्री.शर्मा यांनी अतिशय मनापासून स्वामीजींसोबत या कामात येत असलेल्या अडीअडचणी, गुरुजींचे उद्दिष्ट, वेदांवर संशोधन प्रकल्प उभारण्यासाठी सुरू असलेली धडपडअशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले विचार मांडले. त्यातून गुरुजींची विद्यादानाच्या तळमळीने, येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची असलेली जिद्दच दिसून आली.
पूज्य स्वामीजींनी त्यांना, स्वतःच्या साधनेतून वेदांचे स्वसंवेद्य झालेले स्वरूप उलगडून सांगितले. त्याचसोबत, सनातन संस्कृतीचा अविभाज्य भाग; नव्हे आत्माच असलेले वेद.हे सांभाळणे आणि पुढच्या पिढीपर्यंत त्यांचा वारसा पोहोचवणे किती महत्त्वाचे आहे; सध्याच्या कलिकाळात हे काम सांभाळणे आणि तितक्या समर्थपणे पुढच्या पिढीला याची धुरा सोपविणे हे किती अवघड, आव्हानात्मक आहे.
ब्रह्मतेजाला क्षात्रतेजाची जोड मिळाली पाहिजे!.
संतांनी सर्वसामान्य जनतेसाठी जरी मर्यादित स्वरूपाचा साधनामार्ग सांगितलेला असला; तरी वैदिक परंपराही टिकवून ठेवणं किती गरजेचे आहे.
महाविष्णूंच्या रजोगुणातून ब्रह्मदेवाचे झालेले प्राकट्य, ब्रह्मदेवाचे तप, ब्रह्मदेवाने केलेली सोsहम् साधना, त्यांनी श्री महाविष्णूंच्या नाभिस्थानाच्या आतून केलेला साधनेचा प्रवास, सहस्त्रदलावर स्थित असणाऱ्या ब्रह्मदेवांना साधनेतून (स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत इत्यादी श्री महाविष्णूंच्या सूक्ष्म शरीरातूनचक्रातून प्रवास करताना) सृष्टीनिर्मितीचे झालेले ज्ञान.चतुःश्लोकी भागवत अशा अनेक गहन मुद्द्यांवर सारासार चर्चा झाली.
या कामी सहाय्य होतील अशा अजून कोणत्या सामाजिक बाबी (स्थानिक राजकीय इत्यादी) पाहणं आवश्यक आहे, याचे पू.स्वामीजींनी गुरुजींना मार्गदर्शन केले.शक्य त्या रीतीने, पाठशाळेस मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, पूजनीय स्वामीजींनी त्यांना एक अभिनव सुंदर अशी कल्पना सांगितली. महाराष्ट्रातील प्रचंड मोठा वारकरी संप्रदाय आणि अतिशय मोठ्या संख्येने असलेले भगवद्गीतेला देखील मानणारे साधक यांच्यासाठी.वेद आणि ज्ञानेश्वरी तसेच वेद आणि भगवद्गीता हे एकमेकांशी कशी संबंधित आहेत; याचे संशोधन गुरुजींनी करावे, अशी संकल्पना आणि याची आवश्यकता ही स्वामीजींनी गुरुजींसमोर मांडली!!
या दरम्यान सर्वांचा चहा - फराळ झाला.
यानंतर गुरुजींनी गोरक्षनाथ आणि त्रिशूळाचे अधिष्ठान असलेल्या खोलीत बसून खूप सुंदररित्या, शास्त्रोक्तरीतीने वेदमंत्रांचे पठण केले. गोरक्षनाथ या शब्दातील 'रक्ष' या अक्षरावरून असलेले सूक्त, सर्वांचे आयुष्य शतायुषी होण्यासाठी प्रार्थना, तसेच समस्त चौदा भुवनांमध्ये असणाऱ्या सर्व जीवांसाठी शांतिपाठ, आणि आपल्याला लाभलेल्या आयुष्यामध्ये आपण जे काही आध्यात्मिकदृष्ट्या प्राप्त करू, ते सर्व आपल्याला प्रत्येक जन्मी सोबत असावे आणि ती आध्यात्मिक प्राप्ती (कमाई) आपले परम गंतव्य असणाऱ्या भगवान महाविष्णु चरणी अर्पण करावी. या सर्व विचारांनी बावीकर गुरुजींनी अत्यंत समयसूचकपणे निवडलेली संस्कृत सूक्त, सर्व गुरुजींनी सुस्वर म्हटली!!
यानंतर सर्व गुरुजींचा पूजनीय स्वामीजींनी खूप मोठा सन्मान केला. प्रत्येकास शाल, माऊलींचा प्रसाद आणि मधुरा ताईंना पाठशाळेच्या कार्यासाठी आर्थिक मदत म्हणून काही रक्कम देखील सुपूर्त केली. इतकेच नव्हे; तर स्वामीजींनी अत्यंत विनीतभावाने सर्व ब्राह्मणदेवतांना नमस्कारही केला!
दिवाळीच्या काळातील एक मंगल , शुभ, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय असाच हा प्रसंग!!
आदरणीय स्वामीजींशी सहज बोलल्या गेलेल्या विषयाला त्यांनी इतक्या मनापासून मोठं, सुंदर आणि उदात्त स्वरूप दिलं; त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आणि कृतज्ञ आहे!
सौ. साक्षी बादरायणी