चिंतने ​

ईश्वराचे इंजिनियरिंग

कालच "इंजिनियर्स डे" झाला. सर्व इंजिनियर लोकांना किंवा त्या पद्धतीत काम अथवा व्यवसाय करणाऱ्यांना उगाचच थोडे बरे वाटले असावे.

माझ्या मनात मात्र वेगळाच विचार चालत होता...... मला, आपल्या सर्वांना व या ब्रह्मांडला निर्माण करणारा इंजिनियर कोण ...?

विश्व निर्मिती पासून आज पर्यंत मानवाला ईश्वराच्या या अभियांत्रिकी कलेचा शोध आजतागायत लागलेला नाही, हे सत्य आजपर्यँतच्या सर्व भौतिकात शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचे बौद्धिक एकत्रिकरण केले तरी मान्य करावेच लागते. लघु बुद्धीच्या विज्ञान निष्ठानी वाद जरूर घालावेत.

विश्वाच्या रचनेचा विचार व आपल्या स्वतःच्या रचनेचा विचार जरूर करावा.

आपण आपल्या निर्मितीचा अध्यात्मिक-वैज्ञानिक विचार जेंव्हा करतो तेंव्हा शरीर हे पंचमहाभुतानी बनले व त्रिगुणातून त्यांची गुणांत्मकता व्यक्त झाली.

आईच्या गर्भात आपण बीज म्हणून आलो व नंतर ईश्वर (आत्मा ) त्याच्या क्रिया शक्ती सहित त्याच्या निरंजन स्थिती सह स्थापित झाला.

त्याचीच क्रिया शक्ती (परा ) पुढे आईच्या समष्टीच्या जाणीवेतून आपले विशिष्ट अस्तित्व (शरीर ) तयार होत गेले.

हीच परा आपल्या बिजात विभागली गेली व तिने अपरे मधून विविध शक्ती केंद्रे तयार केली. यालाच आपण आपल्या मधील विविध चक्रे असे म्हणतो (मुलाधार, स्वाधीष्ठान, नाभी, माणिपूर...). ह्या शक्ती अष्टधा प्रकृतीतून आपल्याला व्यकतेत आणते व यालाच आपण माया असे जाणतो.

या मायेच्या प्रभावात सर्व पंचमहाभुते आपला विस्तार साधतात. हे अत्यंत गुहय तसेच जेवढा विचार करावा तेवढे अधिक सूक्ष्म होत जाणारे विज्ञान आहे.

जिवाच्या विशिष्ट वाढी नंतर तो बाहेर वाढीस उद्यूक्त होतो.

पृथ्वीतत्व व जलतत्व हे तेज व वायू यांच्या आधारे सूक्षमातून वाढीस लागते. विविध पोकळ्यातून फिरणारी हि तेज व वायू तत्वे यांचे स्वरूप हि वेगळे असते.

तेज/ अग्नी - मूळ अग्नी (मुलाधार, अग्नी मंडल ), भुजंगम, रुद्र अग्नी, कालाग्नी, ब्रह्माग्नी.

वायू - प्राण, अपान, व्यान, उदान, व समान तसेच नाग, कुर्म, कृकर, देवदत्त, व धनंजय.

हे तेज व वायू तत्व जिवाच्या शरीर धारणेला अंता पर्यंत साथ देतात.

असो, हा विषय खूप खोल आहे. स्वरूपाचे ज्ञान हि अध्यात्मिक भूमिका आपल्याला आपल्या आत्म्या पर्यंत पोहचवते हे नक्की.

नाभि पासून थेट ब्रह्मरंध्रा पर्यंत जाणारा वायू आपल्या मधील सहस्त्र दलातील क्राऊन चक्र एकेका दात्यातून फिरवतो व संलग्न असणारी सहा चक्रे फिरतात...यातूनच अपरेचे कार्य परे मधून कळते...इथेच सर्व संत निरंतर राहतात व पुरुषोत्तमास त्या खऱ्या...मूळ इंजिनियरला त्याच्या इंजिनियरिंग सह जाणतात...

मला माझ्यातील इंजिनियर ची कीव करावीशी वाटली ..

तस्मात् विचार करावा ..

स्वामी स्वरूप स्वानंद
दिव्योन्मेष सत्संग