| Years |
|---|
| २०२५ |
| २०२४ |
| २०२३ |
| २०२२ |
तूच देवी मम स्वरुपी,
खडग घेऊनी अवतार धरी!
कुमकुम तिलके तुझ्या अर्चने,
तीन व अर्ध्या रुपी वास करी !!
तेजस्विनी तू सुवर्णमयी,
मूलाधारी शांत दिसे!
मायेच्या त्या लटिक्या रूपा,
लेवून, आधारी विश्व खुले!!
ब्रह्मज्ञाने अधिष्ठान करोनि,
परा जाणिवे उन्मुख होई !
सोsहम् च्या प्राणगतीतून,
मायेतून 'त्यासी' व्यक्त करी !!
मणिपुरी जशी अन आहाती,
त्रिगुणातून अपार असे !
सत्य संविद् हे तुझ्याच रूपे,
आत्म्याचे तू प्राणेश्वरी सजे!!
विविध आकारी अनेक रूपे,
यांत्रिकतेतून काम करी !
एकरुप त्या भाव समृद्धे,
पुरुषोत्तम तो आकार धरी !!
तूच महेश्वरी, तूच शारदा,
विश्वमोहिनी तूच असे !
जीवात्म्याच्या अज्ञान मुंडणा,
रणचंडीचे रूप धरे !!
स्वरूपी माझ्या प्रकृतीतून
साधन होऊनी कृपा करी !
सहस्त्रदली त्या तुझ्या निवासा
महाशून्यी तू ' हरीच ' असे!
आत्मप्रवासी
स्वामीं स्वरूप स्वानंद
आध्यात्मिक रसग्रहण
परमपूज्य सद्गुरु माऊलींच्या विश्वजननीशी असलेल्या अद्वैततेतून, एकरूपतेतून स्फुरलेलं असे हे काव्य होय!!
हे अतिशय अद्भुत असं काव्य वाचून उमटणारे भावतरंग येथे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करते आहे.
परमपूज्य स्वामीजी या काव्याद्वारे सांगतात, " हे देवी! तू माझेच स्वरूप आहेस! " म्हणजेच मला असे वाटते की, साधकाला आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर स्व-रूपात आणि देवी/देवता-स्वरूपात जी अभिन्नता प्रतीत होते, त्याच अद्वैत, एकजिनसी, अभेद, एकत्वाच्या अंतरंग जाणिवेतून स्वामीजींची हे देवीबद्दल स्फुरलेली काव्यसुमने डोलत आहेत !!
हे देवी हे आदिशक्ती!! तू माझेच (आत्म)स्वरूप आहेस. तू हाती तलवार घेऊन अवतार धारण केला आहे. तू साडेतीन पिठाच्या रूपात (ओंकार, शक्तिपीठे, मानवी शरीर) निवास करतेस. कुंकवाचा टिळा लावून तुझी पूजाअर्चा केली जाते.
हे जगन्माते! तू तेजस्वरूप, सुवर्णासारखी कांती असणारी आहेस. तू मानवी देहाच्या मूलाधार चक्रात, शांतरीतीने (सुप्त) निवास करतेस. खरे तर तू पराशक्ती, मूळ शक्ती आहेस; परंतु मायारूपी खोटे रूप धारण करून, निराकाराला आधार देऊन, संपूर्ण ब्रह्मांड अस्तित्वात आणतेस.
(परा-> अपरा-> माया)
हे मूळमाये! तू मनुष्याच्या स्वाधिष्ठान चक्री असणारी ब्रह्मज्ञानाची जाणीव आहेस. तेथून 'परा' स्थानी तुझा प्रवास उर्ध्व दिशेने सरकत असतो. प्रणव ( सोsहं) च्या गतीद्वारे, तू मायेतून ईश्वरास व्यक्त करतेस.
हे जगदंबे! मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर तसेच अनाहत चक्रांतील सळसळत्या शक्तीप्रवाहाची तुझीच जाणिव आहे. त्रिगुणांनी, त्रिगुणांवर आधारित जरी हे विश्व निर्माण करतेस; तरी तू गुणातीत आहेस! [साधकाला अनाहतानंतर विशुद्धाच्या ठिकाणी प्राप्त होणारी त्रिगुणातीत अवस्था, हा तुझाच प्रसाद आहे.] आत्म्याची (ईश्वराची) तू प्राणप्रिया आहेस. तू व ईश्वर हे सर्व परिस्थितीत, सदासर्वदा एकरूपच आहेत. आत्मा तुझ्याशिवाय राहू शकत नाही. 'सत्याला जाणून घेणारे' असे तुझे स्वरूप आहे !
हे आदिमाये! तू अनंत आकार, विविध रूपे घेऊन, साचेबद्ध आखीव - रेखीव कलात्मकतेतून (यांत्रिकतेतून), विश्वाचे उत्पत्ती स्थिति व लयाचे कार्य कुशलतेने संपन्न करतेस. तुझ्या पुरुषोत्तमाशी (परब्रह्माशी) असणाऱ्या एकजिनसी, अभिन्नतेमुळेच निर्गुण निराकार ईश्वरास, सगुण स्वरूप प्राप्त होऊ शकले!
हे भगवती ! तुझे स्वरूप म्हणजेच महेश्वरीचे (शंकराच्या शक्तीचे), शारदेचे (सरस्वतीचे) होय! तूच अखिल ब्रह्मांडास मोहून टाकणारी, सर्व जीवमात्रांसह, जड व्यक्ततेस देखील कालगतीत बांधून ठेवणारी आहेस. मनुष्याच्या / जीवात्म्याच्या अज्ञानास कारणीभूत असणारे -षडरिपू (काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर) आणि त्रिगुण (सत्व, रज, तम) अशा नऊ दोषमूलक बाबींचा नाश करण्यासाठी, आदिशक्ती ही नवदुर्गेचे, चंडीचे रूप धारण करते!!
हे परमेश्वरी! तुझे स्वरूप असणाऱ्या माझ्या प्रकृतीतून (अष्टधा प्रकृतीने बनलेल्या शरीरातून) तूच (सोs हम् ) रूपी 'साधन' हो. माझ्यावर ही कृपा कर. तुझे निवासस्थान म्हणजे परमोच्च चक्र - ' सहस्रदल ' हे होय! या ठिकाणी मला घेऊन चल. येथे योग्यास प्राप्त होणाऱ्या समाधी स्थितीत (महाशून्य अवस्थेत) तू 'हरीमय'च आहेस. येथे तुझे परमशिवाशी असणारे अद्वैत, माझ्या अनुभूतीत येऊ दे!!
काव्य रसग्रहण : सौ. साक्षी बादरायणी
( दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे.)
|| वारी डोले ||
विठ्ठल तो आला आला |
आषाढी तो सजला सजला ||
कर्माच्या त्या नादामधुनी |
ज्ञानमंदिरी दिसला दिसला ||
भक्तीच्या त्या देव मंडपी |
तुळस-हारी रमला रमला ||
रुप नव्हे ते लावण्य |
अवघा स्पंदांचा प्रकाश ||
मंत्रमुग्ध ते दीप्तीमंत ते |
वेद स्पष्ट ते, अमूर्त घन ते ||
कटी करी ते, घटी भरी ते |
अंतरातून सहजची उमटे ||
गुरू वाक्याच्या अति लाघवे |
प्रेम भरे शब्दातून ते सरे ||
निशब्द भावामधुनी डोले |
अनाहताच्या सुदूर वसे ||
पंढरपूर मला न ठावे |
कळस बघुनी वारी डोले ||
चाल चालावी सुदूर |
पंढरपुरी जाईल निश्चित ||
अनंत तो आहे अगाध |
त्याचा नाही आरपार ||
गुरुबोधी व्हावे स्थिर |
तेच आहे सर्व सार ||
आत्मप्रवासी
स्वामीं स्वरूप स्वानंद
आध्यात्मिक रसग्रहण
प.पूज्य स्वामीजींना अभिप्रेत असणारी वारी, ही भौतिकातील, प्रत्यक्ष जीवनातील आळंदी, देहू येथून निघून पंढरपुरात पोहोचण्याची पायी वारी नाही; तर साधकाच्या अंतरंगातील, गुरुपदिष्ट साधनेच्या विहंगम, मनोहारी प्रवासातून फुलणारी ही वारी होय !!
श्री विठ्ठल पांडुरंग हा आषाढीला सुंदरसे रूप घेऊन प्रकट झाला...हे पांडुरंगाचे प्राकट्य बाहेरच्या कुठल्याशा मंदिरात झालेले नाही; तर साधकाने जे आर्ततेने, ज्ञानजाणिवेने व भावभक्तीने भारलेले असे कर्म (सोsहं साधना) केले, त्या कर्माच्या नादातून पांडुरंग प्रकटला. इथे प.पूज्य स्वामीजींना असे सांगायचे असावे की, साधकाच्या ज्ञानयुक्त, भावभक्तीमय कर्मात सातत्य हवे; तरच त्यातून एका विशिष्ट लयीचा उद्गम होईल आणि अशा उच्चकर्माच्या लयीतून उमटणाऱ्या नादामधून, आपल्याच हृदयाच्या ज्ञानरूपी मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घडेल!! तुळसरूपी भक्तीवृंदा आणि त्याग व समर्पणाचा हार मिरवत श्री पांडुरंग, देवमंडपात विराजमान झालेले आहेत!!
या कडव्यात सद्गुरू माऊली पांडुरंगाचे दिव्य स्वरूप वर्णन करतात...अगदी सहाच ओळींत सगुण विठ्ठलाचे निर्गुण तत्व, गुरूमाऊली उकलून सांगत आहेत. श्री विठ्ठलाचे मूर्तिरूप हे केवळ दगडाचे, निरस, स्थूलातील सगुण रूप नव्हे; तर ती 'लावण्याची खाणच'...सौंदर्याची पराकाष्ठाच जणू! स्थूलाकडे पाहण्याची अव्यक्त सौंदर्यदृष्टी ही प.पूज्य स्वामीजी येथे सूत्ररुपाने सांगत आहेत !!
ही वरवर दगडाची दिसणारी विठ्ठल मूर्ती म्हणजे निर्गुण परब्रह्मापासून येणाऱ्या स्पंदांचे (प्रकाशरूपी लहरींचे) तेजघन स्वरूपच होय! या परब्रह्म लहरींचे तेजाळलेले, ज्ञानाची प्रभा दाही-दिशांना पसरवणारे, वेदांनी विशद केलेले स्वरूप हे पाहणाऱ्याचे भान हरपविणारेच आहे. अव्यक्ताचे 'कोंदाटलेले' असे स्वरूप हे कमरेवर हात ठेवून उभे असून, सृष्टीतील हर एक घटात, निर्मितीत ओतप्रोत भरलेले आहे! साधकाच्या निर्मल हृदयातून हे 'अदृश्य तरीही एकवटलेले' स्वरूप सहजच उमटते....प्रतितीस येते!
विठ्ठलाचे मूर्तिमंत सौंदर्य घनस्वरूप, आपले अंतरात कसे उदय पावेल ?. तर सद्गुरुबोधाने. साधक जेव्हा हृदयपूर्वक, विनम्रतेने, गुरुनिष्ठेने व तळमळीने साधन करायला लागतो; तेव्हा गुरुवाक्याच्या सामर्थ्याने, गुरुबोधाच्या आर्जवाला लीन होऊन श्री पांडुरंगाचे स्वरूप...प्रेमभराने, शब्दांच्या पलीकडे जाऊन, नि:शब्द मौनातून आनंदाने प्रकट होते!! मानवाच्या सूक्ष्म शरीरातील, 'अनाहत' चक्राच्या पुढे, श्री विठ्ठलाचे स्थान आहे, असे गुरुमाऊली येथे सांगतात. साधनेच्या प्रवासात साधक हृदय हे शुद्ध भगवत्प्रेमाने ओथंबून वाहते...नंतर त्यास विशुद्धातील ज्ञानजाणिव मायेच्या भ्रमातून बाहेर काढते. पुढे आज्ञाचक्री 'औटपीठ' वसते; जिथे श्री पांडुरंग निर्गुण स्वरूपात विराजमान असतात... म्हणूनच 'अनाहताच्या सुदूर' !!
'नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोsहम् ध्वनि असे गुंजत' हीच ती प्राणाची वारी... आपल्या पंढरपुरातील (सहस्रदलातील) आत्मस्वरूपाला पाहून अविरत डोलणारी !!
प.पूज्य स्वामीजी, अतिशय महत्त्वाचा संदेश साधकांना देत आहेत. आपण साधनेच्या मार्गावर सतत...अखंडपणे चालत राहावे.....एक ना एक दिवस जरूर आपण पंढरपुरास म्हणजे आपल्या आत्मस्वरूपास प्राप्त होऊ! भगवंत (आत्मा) हा अनंत आहे...त्याला कोणी मोजू शकत नाही. तो अगाध आहे...त्याला जाणणे कठीण आहे... त्याचा आदि-अंत कळणे तसेच त्याच्या आत-बाहेर कोणती वस्तू आहे, हे देखील समजणे अवघडच आहे. म्हणून साधकाने सद्गुरूंनी केलेल्या 'बोधावर' स्थिर व्हावे; कारण ते सर्व साधनांचे 'सार' आहे! पंढरपुरात पोहोचण्याचे 'गुरुबोध' हेच मुख्य साधन होय! सद्गुरूंच्या तपश्चर्येने, ज्ञानाने, स्वानुभवाने, भक्तीतेजाने आणि निष्कामतेने चिंब भिजलेले 'बीज' म्हणजेच त्यांनी दिलेला बोध - 'गुरुबोध' होय!! त्यामुळे एकटा गुरुबोधच आपल्याला श्री पांडुरंगाचा तत्वबोध करवून, आपले जीवन सार्थकी लावण्यास समर्थ असतो; हेच प.पूज्य स्वामीजी या आशयघन काव्यातून सुस्पष्ट करतात.
|| श्री सद्गुरूचरणार्पणमस्तु ||
काव्य रसग्रहण : सौ. साक्षी बादरायणी
( दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे.)
|| श्रीराम दर्शन ||
प्रभू रामचंद्र हे, नाम-रुप हे
मम हृदयी ते भाव फुलवते ||
पितृ हृदयी ते दशरथी वसते,
नम्र भाव तो आज्ञी दिसते ||
मातृभाव तो कौसल्ये जपते,
हृद्य प्रेम ते हृदी फुलवते ||
भ्रातृ भाव तो, भरत जाण तो,
लक्ष्मणासह सतत जागतो ||
सीता जाणे रामरूप ते,
रामची जाणे, शक्तिस्वरुप ते ||
गुरुभाव तो, गुरुज्ञान तो,
शून्यातून तो रामच कळतो ||
ज्ञान-कर्म ते जीवन सरते,
रामकथेतून, भक्ती उमलते ||
अहिल्या, शबरी, बिभीषणही ते,
तपातुनी निरंजनी पावते ||
राम जीवनी, राम जनी-मनी,
भक्त हृदय ते असे अंतरी ||
भक्त हृदय हे, हनुमंत हृदय ते,
रामहृदय हे, समर्पित भाव ते ||
रुधिरही वाहे राम नाम हे,
पेशींमधुनी चिरंजीव ते ||
आत्मप्रवासी
स्वामीं स्वरूप स्वानंद
आध्यात्मिक रसग्रहण
प्रभू श्रीराम म्हणजे ईश्वराचे सगुण स्वरूप. या सगुण रूपाची आपण उपासना करतो. त्याचा आधार घेतो. त्याला भक्तिभावाने काही अर्पण करू शकतो पण खरे राम दर्शन हे त्याला आपल्या अंतःकरणातून जाणून घेतल्यानंतर, त्याला आपल्या ह्रदयात स्थापित केल्यावरच होते. श्रीराम हे सगुण रूपात अवतार घेऊन , शून्य अवस्थेच्या जाणिवेतून आपले जीवन जगले. ही शून्य स्थिती म्हणजे आपल्या भ्रूमध्यापाशी असलेली गुरूतत्वाची ज्ञान जाणीव. आपल्या आत्मस्वरूपाची ज्ञान जाणीव. या जाणिवेची दोन दले आहेत (विवेक आणि वैराग्य). हे गुण श्रीरामांच्या अंगी होते व ते त्या जाणिवेतून आपले जीवन जगले. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरूषोत्तम असे म्हटले जाते.
श्रीरामांनी जेंव्हा भारतभर तीर्थयात्रा केली तेंव्हा त्यांना या संसाराच्या भ्रांत स्वरूपाची अनुभूती आली. त्यांना जीवनाच्या प्रत्येक स्तरावरील भ्रांती अनुभवास आली. बाल्यावस्थेत, यौवनात अथवा वृद्धापकाळी प्रत्येक जीव हा कसा अहंकाराने ग्रासलेला आहे व तो आपल्या देहालाच आत्मा मानून सुखदुःख भोगत जीवन जगतो. शेवटी जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो. हे जीवनाचे विदारक चित्र बघून रामाला सर्व विषयांचा तिटकारा आला व त्याच्यात वैराग्य जाणीव स्थापित झाली. या आसक्तीतून बाहेर पडण्यासाठी गुरूकडून ब्रह्म ज्ञान प्राप्त करून घेतले. येथे त्याच्या अंतःकरणात विवेक व वैराग्य स्थिर झाला. हीच शून्य अवस्था. ह्या अवस्थेतून, जीवनात समोर येणार्या प्रत्येक प्रसंगात, आपले चित्त स्थिर ठेवून, श्रीरामांनी दिव्य जीवन जगून दाखवले व आपले मर्यादा पुरूषोत्तम हे नाव सार्थक केले.
ह्या काव्यातून श्रीराम आपल्या जीवनातील प्रसंग कसे जगले याची उदाहरणं देताना, आपण ही ते गुण अंगीकारले तर आपल्यालाही राम दर्शन घडेल असे आश्वासन दिले आहे.
श्रीरामांच्या ह्रदयात आपले पिता दशरथ यांच्या प्रती नम्र भाव व आज्ञाधारक पणा होता. म्हणूनच राज्याभिषेकाच्या आनंदाला झुगारून पित्याचे वचन मोडणार नाही याची दक्षता श्रीरामांनी घेतली. स्वतःचे सुख, मानसन्मान बाजूला ठेवून पित्याचे वचन अग्रस्थानी मानून ते वनात जाण्यास सज्ज झाले.
माता कौसल्येच्या मनात रामा बद्दल प्रेमभाव तर होताच पण हे प्रेम आंधळे किंवा आसक्तीतून आलेले नव्हते. जेंव्हा राम वनवासाला निघाले तेंव्हा कौसल्या मातेच्या दृष्टीत वात्सल्य आणि वियोगाचे दुःख तर होते पण त्याबरोबर कर्तव्य भावना होती. तिने रामाला वनात जाण्याला थोडाही विरोध केला नाही. यातून प्रेम कसे डोळस असावे हे कळते. जगा बद्दल प्रेम हवे पण त्या प्रेमात आसक्ती, अभिलाषा नको. हा गुण श्रीरामात सुद्धा दिसतो.
रामाच्या ह्रदयात आपल्या भावांप्रती ही उत्कट प्रेम होते पण त्या प्रेमाच्या स्वरूपात ही फरक दिसतो. लक्ष्मण हा रामाचा सावलीसारखा पाठिराखा होता. त्याचे भक्तीचे चे स्वरूप सेवाभाव हे होते. लक्ष्मण हे संयम आणि वैराग्याचे प्रतीक आहे. म्हणून आपल्याला राम दर्शन घ्यायचे असेल तर संयम व वैराग्य हे गुण अंगी बाणवावे लागतील. तसेच भरताचे भक्तीचे स्वरूप वेगळे आहे. भरत व राम यांच्या मधे भक्त व देव असे नाते होते. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून, भरत रामा प्रमाणेच विरक्त जीवन जगत, त्या पादुकांचे पूजन करत होता. त्या पादुका अयोध्येचे रक्षण करतात हा आपल्या देवावर त्याचा विश्वास होता. हा भरताचा विश्वास व समर्पण भावही होता.
सीता ही शक्तीस्वरूपीणी आहे. राम हा परमात्म स्वरूप असून शक्तीच्या योगे प्रकट होतो.
राम -सीता हे पुरूष-प्रकृती स्वरूप असून ते कायम एकमेकांशी एकरूप असतात. त्यामुळेच सीता रामाचे स्वरूप जाणत होती. वसिष्ठ ऋषि हे श्रीरामाचे आध्यात्मिक गुरू होते. त्यांना शिष्य भावाने शरण जाऊन त्यांच्याकडून ज्ञानाचा उपदेश रामाने घेतला. राम स्वतः जरी ज्ञानी पुरूष होता तरी सगुण रूपात अवतार घेतल्यावर तो गुरूला शरण गेला व ज्ञान प्राप्त करून, शून्य जाणिवेतून आपल्या गुरूला आपल्या ह्रदयात स्थापित केले. हा संपूर्ण शरणागत भाव ही गुरूबद्दलची समर्पित वृत्ती रामाच्या ह्रदयात होती. ज्ञान प्राप्त करून जसे राम आपले कर्म नैष्कर्म भावातून करत होते, तसे त्यांच्या जीवनात त्यांचे पूजन अनेक भक्त करत होते. अहिल्या, शबरी, बिभीषण अशा भक्तांची देखील भक्ती राममय होऊन उमलत गेली. श्रीरामांन बद्दल च्या निस्सीम भक्तीतून, त्यांच्या तप साधनेतून ते राममय झाले. राम तत्त्वाशी, त्या निरंजनाशी एकरूप झाले व मोक्ष प्राप्त करून घेतला.
राम जीवनातून दिसणारे त्यांचे गुण आपण अंगीकारले तर आपल्या ह्रदयात राम स्वरूप कोरले जाईल.
हनुमंत हे रामाचे दास होऊन राहिले. दास्यभक्तीचे हे उत्तम उदाहरण आहे. रामाप्रती हनुमंतासारखा समर्पित भाव असला की राम व हनुमंत यांच्यातील उच्च स्तरावरील भक्ती समजते. आपल्या रक्तातून जर रामनाम, रामस्वरूप सतत वहात राहिले तरच आपल्या पेशीपेशीतून रामाप्रती, हनुमंतासारखा समर्पित भाव तयार होईल व आपल्याला रामरूप होता येईल. आपण शून्य अवस्थेत स्थिर होऊ व आपली जन्म मरणाची प्रदक्षिणा थांबेल. आपण ही हनुमंतासारखे चिरंजीव होऊ. येथेच खरे श्रीराम दर्शन होऊन आपले जीवन कृतार्थ होईल.
काव्य रसग्रहण : जयंती यारगोप
( दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे.)
|| ॐ श्रीराम ||
अव्यक्ताच्या देठा मधुनी,
व्यक्त होई ते विश्व!
अनाहताच्या स्पंद विश्वि या
ॐ श्रीराम हे ब्रह्म!!
आहत स्वरूपी विश्व पसारी, शक्ती रूप ते अवतरी!
राम जाणीवे ओमकारातुनी,
शिव स्वरूप ते आकारी!!
महद्ब्रह्मी तो महद् घटी
या घटा घटातून वसे!
अघटित घटने अनेक पणे तो अव्यक्त होऊनि असे!!
असुनी नसे तो नसोनी असतो तरी वसतो हे सत्य !
सत्य स्वरूप हे शक्ती सहित ते प्रसव साधे नित्य!!
आदिबीज श्रीराम जाणीवे फुलवी सर्व हा वृक्ष!
लक्ष ठेवुनी, दक्ष होऊनि अलक्ष्यी शोधी सत्य!!
आत्मप्रवासी
स्वामीं स्वरूप स्वानंद
आध्यात्मिक रसग्रहण
साधारणपणे श्रीराम म्हटले की सर्वांच्या मनात येते ती सगुण अवतार घेतलेली, शून्य अवस्थेतून आपले जीवन जगलेल्या, दाशरथी रामाची मूर्ती. हे सगुण स्वरूप जरी महत्वाचे असले तरी साधकाला ह्या सगुण रुपाच्या सहाय्याने पोहोचायचे आहे ते निर्गुण श्रीरामाच्या स्वरूपापर्यंत. हे निर्गुण श्रीरामाच्या स्वरूपाचे वर्णन या काव्यातून केले आहे.
परब्रह्म हे अव्यक्त महत् स्वरूपात आहे. ते सत् चित् आनंद स्वरूप आहे. ह्या परब्रह्मा चा मूळ संकल्प आहे " मी ब्रह्म आहे, सर्वं खल्विदं ब्रह्म ". ह्या संकल्पातूनच ब्रंम्हांडाची निर्मिती झाली. परब्रह्माच्या या संकल्पाच्या जाणिवेतून, सुक्ष्मातून निर्माण झाला तो विश्वात्मा. हा विश्वात्मा पुढे विश्वाची निर्मिती करतो. हेच ऊँकाराचे विश्वात्मक स्वरूप. ज्यातून " ऊँ " हे अनाहत स्वरूप व " श्रीराम " हे आहत स्वरूप प्रकट झाले. म्हणून
" ऊँ श्रीराम " हे आदिबीज म्हटले आहे.
काव्यामध्ये अव्यक्ताच्या देठामधून विश्व व्यक्त स्वरूपात आले असे म्हटले आहे. म्हणजे ते परब्रह्माचे सत् स्वरूप हे त्या शक्तीच्या माध्यमातून आकाराला आले आहे. " ऊँ " हे अनाहत स्वरूप आहे तसे " श्रीराम " हे आहत स्वरूप आहे. येथे श्री हे शक्ती चे प्रतीक आहे तर राम हे सत् ज्ञान स्वरूप, शिव स्वरूप दर्शवते. ' श्रीराम " या आदिबीजाच्या जाणिवेतून हे शिवतत्व आकाराला येते. महद्ब्रह्म हे जर एक महद् घट म्हणून संबोधले तर जसे या विश्वाच्या घटात अनेक अघटीत घटना घडतात पण तरी ते महद्ब्रह्म हे अव्यक्त असते, अलिप्त असते तसेच प्रत्येक मनुष्य शरीर हे घट समान आहे. तसे त्या प्रत्येक घटात देखील हे आदिबीज अव्यक्त स्वरूपात स्थित आहे.
ते राम तत्व प्रत्येक जीवात स्थित असते पण ते अलिप्त असते, म्हणजेच असून नसल्यासारखे असते. ही आदिबीजाची सुरवात म्हणजेच अज्ञानाची सुरवात असते. येथूनच अज्ञानाला सुरवात झाल्याने साधक सत्य ज्ञाना पासून दुरावला. म्हणून त्याला आपल्या अंतरंगातील सत् स्वरूपाची जाणीव नाही. तो भ्रांत आहे. असे असले तरी ते सत् प्रत्येकात असतेच व ते सत्य हे सतत शक्ती सहीत प्रसव पावते. म्हणून हे आदिबीज हे "श्रीराम "असे आहे (श्री - शक्ती स्वरूप, राम - सत्य ज्ञान).
हा संसार , हे विश्व हे अश्वत्थ वृक्षा समान आहे. ज्याचे मूळ हे ऊर्ध्व आहे. हे मूळ म्हणजेच आदिबीज आहे ज्याच्यातून हा संपूर्ण वृक्ष सतत फूलत आहे. हा वृक्ष एक भ्रम आहे म्हणूनच साधकाला आपल्या साधनेतून , दक्ष राहून ह्या वृक्षाच्या मूळा पर्यंत पोहोचायचे आहे. आपल्या साधनेतून जेव्हा साधक लक्षपूर्वक हे संसाररूपी अश्वत्थ वृक्षाचे ज्ञान घेईल व त्याच्या मूळाचा शोध घेईल तेव्हाच तो त्या मूळ अव्यक्त सत्या पर्यंत पोहचू शकेल व आपल्या जीवनाचे ध्येय साध्य करून घेईल. म्हणजे त्या आदिबीजाच्या परे असलेल्या परब्रह्मापर्यंत पोहचेल. त्याच्याशी एकरूप होईल.
म्हणून साधकाने ह्या आदिबीज
" ऊँ श्रीराम " ह्या निर्गुण स्वरूपापर्यंत पोहचायचे आहे. ह्या आदिबीजाचे स्वरूप व त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग ह्या काव्यातून सांगितला आहे.
काव्य रसग्रहण : जयंती यारगोप
( दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे.)
गजानन महाराज - प्रकट ब्रह्म
अवनीवर वर शिवची प्रगटे, अव्यंग दर्शने पहाट अहा! गणेश रूपे दिव्य पुरुष हा, संत गजानन भक्त महा!!
उन्मनी त्या स्पन्द जाणीवे, स्वरूपातून हा शिव भूमिके! नामरूपात्मक गणा गणातून, सूक्ष्म शिव तो प्रकाशित दिसें!!
अतिमानसी सत्य अनुभवी, मानव देही संत असा! जीवनी त्याच्या स्पर्श जाणीवे, अनुभव घ्यावा सर्वत्र बघा!!
मी नं जाणले त्या संतासी, "विजय" ग्रन्थ हा त्या लीलेसी! माझ्याच माझ्या स्वार्थ जीवनी, जीवन मूल्या मीच खालवी!!
मी नं जाणले त्यांचे जीवन, फकीरीत ते सदाच व्यस्त! अव्यक्त दृष्टी त्या ब्रह्मची व्यक्त, गणात असोनी सदा निरासक्त!!
प्रकट दिनी यां प्रकट विचारे, भाकरीतच त्या भक्ती बांधूनी! भक्त असोनी अज्ञान भूमिके, अज्ञानातून ज्ञानच प्रार्थी!!
कृपा करावी आम्हावरी आता, तुम्हीच व्हावे तत्वज्ञ संता! आत्मशोधी त्या स्वरूप दाऊनी, स्वरूप स्वानंदी रमवा!!
आत्मप्रवासी
स्वामीं स्वरूप स्वानंद
आध्यात्मिक रसग्रहण
या काव्यातून गजानन महाराज यांची स्तुती केली आहे. महाराजांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमी शके १८००, म्हणजे इ.स. १८७८च्या२३फेब्रुवारीला.
सूर्य मध्यान्हीला आलेला, जमीन तापलेली, हवाही तापलेली म्हणून पाखरं झाडांच्या आश्रयाला गेलेली. अशा तप्त वातावरणात हा पूर्ण निवालेला योगी, निवांत, निराश्रय बसला होता.
तो म्हणजे, "नित्यतृप्त निराश्रयः"
या गीतेतल्या वर्णनानुसार असलेली, योग-ज्ञानाची मूर्तीच. त्यांचे पहीले बोलणे हेच ज्ञानाचे होते.
"एक ब्रह्म जगदांतरी |
ओतप्रोत भरले असे ||
महाराजांनी उच्चारलेले केवळ हे दोन शब्द. त्यांचे ब्रह्मज्ञानच शब्द रूपाने प्रकट होत होते. ते प्रकट झाले तेच त्यांच्या योगज्ञाना सह, ब्रह्मज्ञाना सह. म्हणूनच त्यांना प्रकट ब्रह्म म्हटले आहे. त्यांच्या प्रकटीकरणाने आर्त, जिज्ञासू, साधक वा सिद्ध अवस्थेप्रत पोहोचण्याच्या अवस्थेत असलेल्या सर्व पातळीवरील भक्तांसाठी ईश्वरी साक्षात्काराचा मार्ग खुला करणारा मार्गदर्शक मिळाला.
प्रत्येक माणूस जिथे असेल त्या पातळीवरून त्याला वरच्या पातळीवर नेणे हे संतांचे काम असते. महाराजांच्या लीला चरित्रातून हे आपल्याला दिसते. त्यांचे हे प्रकटीकरण हे 'धर्मसंस्थापनार्थाय' होते.
ते स्वतः शिव स्वरूप होते व "गण गण गणात बोते" हा मंत्र लोकांना सांगून, त्यांनी हा बोध दिला की, मी परब्रह्म स्वरूप आहे व प्रत्येक जीवात, म्हणजे प्रत्येक गणात,जे नामरूपात्मक जीव आहेत त्या प्रत्येक गणा मध्ये हे सूक्ष्म शिव तत्व स्थित आहे.व तेच आपण जाणायचे आहे.
ते नेहमी अतिमानसीक जाणिवेत राहूनही ईश्वरीय सत्य जाणीव अनुभवीत होते. ते मानवी देहात ब्रह्म स्वरूपच अवतरले होते. त्यांच्या कृपेचा स्पर्श ज्या जीवांना झाला त्यांच्या जीवनात क्रांती घडून आली व ते आध्यात्मिक स्तरावर ऊंच पातळी गाठू शकले. याचे उदाहरण म्हणजे भास्कर पाटील. त्याची विहीर कोरडी होती. महाराजांनी तहान लागली म्हणून पाणी मागितल्यावर त्याने ते नाकारले व तो महाराजांना बरेच बोलला. महाराज विहीरीकडे गेले, काठावर बसून डोळे मिटून ईश्वरी सत्तेला आवाहन केले. एक भक्त , योगी आवाहन करत होता. विहिरीला झरा फुटला आणि ती पाण्याने भरून गेली. शेवटी महाराज हे योगेश्वर-भगवान शिवाचेच अवतार होते. शंकराला तहान लागल्यावर गंगा नदी ही प्रकट होणारच. सामान्य माणसाला हा चमत्कार वाटतो पण ईश्वरी शक्तीशी संपर्क साधण्याची ध्यान प्रक्रीया हे महाराजांचे नित्याचेच उपकरण होते पण ह्या कृतीतून भास्कराला हा कोणीतरी सत्पुरुष आहे हे समजले व त्याने शेतीचे काम टाकून धावत जाऊन महाराजांचे पाय धरले. एका क्षणात त्याचे अंतःकरण पालटले व भास्कर महाराजांचे स्तवन करू लागला.
"संत चरणरज लागता सहज |
वासनेचे बीज जळोनी जाय ||"
हे संत वचन आहे. संतांचा सहवास, त्यांचे शब्द मोठा परीणाम करतात. त्यामुळे माणसाचं चित्त शुद्ध होतं आणि तो ईश्वर प्राप्ती ला योग्य होतो. तेच हा ईश्वर प्राप्तीचा अंतरंग प्रकाशित करतात. भास्कर पाटील ते सहज करू शकला.
अशा अनेक लीला या "गजानन विजय" या ग्रंथात नमूद आहेत. ह्या प्रसंगाकडे खरंतर महाराजांची लीला अथवा चमत्कार म्हणून न बघता त्यामागील संतांची भूमिका समजून घ्यायला पाहीजे परंतु मानव हा त्याच्या स्वार्थ वृत्तीत आकंठ बुडाल्याने तोच त्याचे जीवन खालच्या स्तरावर नेऊन ठेवतो. कर्मबंधनात अडकतो व दु:ख भोगत बसतो.
संतांचे जीवन हे त्यांच्या कृतीतून समजून घ्यायचे आहे. महाराज हे नेहमी फकीरी वृत्तीत असत. त्यांच्या प्रकट दिनी देखील त्यांच्यातील अनासक्त वृत्ती दिसत होती. कोणतीही उपाधी नाही. पाणी पिण्यासाठी पात्र म्हणून एक भोपळा आणि हातात कच्च्या मातीची एक चिलीम एवढ्या दोनच वस्तू त्यांच्याजवळ दिसत होत्या. त्यांचे ऐश्वर्य म्हणजे चारही दिशा त्यांच्या जहागीरीत येतात, म्हणजेच चारही दिशांना त्यांची सत्ता चालते.. ईश्वर स्वरूप असा हा योगज्ञानी, महाराजांच्या रूपात पहायला मिळतो. ते सर्वांच्यात राहून सर्वांतून अलिप्त, निरासक्त जीवन जगत.
त्यांच्या या प्रकट दिनी ते त्यांच्या विचारातून, त्यांच्या अज्ञानी भक्तांना, त्यांच्या अज्ञानातूनच ज्ञानाचा बोध करून देत व भक्तांचा प्रेमाने सांभाळ करीत आहेत. त्यांचा एक भक्त, भाऊ कंवर ह्याला महाराजांना भाकरी,भाजी ,कांदा, पिठलं खाऊ घालायची इच्छा होती. त्याचे मन इतके शुद्ध, निःस्वार्थी होते की तो गाडी चुकला तरी महाराज त्याच्याकडून प्रसाद घेण्यासाठी उपाशी राहीले व त्याने आणलेले पिठले भाकरी उशीराने सेवन केले. भाऊ कंवर हा विलक्षण अंतःकरणाचा भक्त होता. "तुमचे स्मरण नित्य राहो" एवढीच त्याची महाराजांकडे मागणी होती. अशा भक्तांवर महाराजांची कृपा होती.
कवी म्हणतात की अशी कृपा आम्हा सर्वांवर राहू दे. त्यासाठी तुम्ही तत्वज्ञ संत होऊन सर्वांना हे तत्त्वज्ञान प्रबोधीत करून, आम्हाला हा आत्मशोध घेण्यास प्रवृत्त करा. आम्हाला आमच्या आत्मस्वरूपाच्या आनंदात रममाण होऊ दे , अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतात.
काव्य रसग्रहण : जयंती यारगोप
( दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे.)
अद्वैत
मीच माझ्या अंतरातून, खुलत जव येत असे | मुग्ध मधुर कलिके सम, फुलत जव जात असे ||
पाकळीत गंध भरोनी, मीच सदा दरवळी वसे | रंग रंगी रंगातुनी, मीच रंगी दंग असे ||
तूच माझ्या देहातुनी , कळी असोनी फुल कसे| मीच माझ्या भावातुनी, सहस्रदली उमलत दिसे ||
तूच माझे शब्द अन, तूच माझे भाव ही | हृदयातून आलेख ओढीत, शुष्क जीवनी सूर्य ही ||
तूच मी होऊनी, मीच तूची होत असे | प्रेम तेच एकरुप, विष्णुप्रिया सहज दिसे ||
आत्मप्रवासी
स्वामीं स्वरूप स्वानंद
आध्यात्मिक रसग्रहण
साधक जेव्हा आपल्या साधनेतून, मन-बुद्धीच्या ऐक्याच्या जाणिवेतून आपले चित्त शुद्ध करून तो त्या परमतत्वाशी एकरुप होतो, म्हणजेच तो साधक द्वैत स्थितीत असतानाआपल्या "सोहम ध्यान" साधनेतून त्या अद्वैत तत्त्वाचा स्पर्श अनुभवतो. तेव्हाचा त्याचा मनोभाव, त्याची अंतरंग स्थिती, याचे वर्णन 'अद्वैत ' या काव्यातून केले गेले आहे.
ही अद्वैत स्थिती, ज्यामधे ईश्वरीय तत्त्वाशी एकरूपता साधली जाते त्यालाच उन्मनी अवस्था असे ही म्हटले जाते. आपल्या अंतरंग ध्यान साधनेतून साधक जसा जसा शुद्ध होत जातो, म्हणजेच देहबुद्धी ते आत्मबुद्धी हे परिवर्तन साधण्याच्या प्रक्रियेतून तो आपल्या एक एक चक्राच्या जाणीवा फुलवत जातो. आपल्या षट्चक्रांच्या जाणीवा फुलवताना प्रथम मुलाधार चक्रापाशी तो मूळ तत्वाचे ज्ञान प्राप्त करतो. ह्यातून पुढे स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत चक्रापाशी ब्रह्मा, विष्णू, महेशाच्या उत्पत्ती-स्थिती-लय जाणीवेशी संधान साधतो.
कंठा पाशी स्थित विशुद्ध चक्रापाशी, हेच रुद्र म्हणजे हनुमंताचे स्थान जेथे इडा-पिंगला नाडीतून प्रवाहीत होणा-या विषय-वासनांचा नाश होतो. चित्त शुद्ध होते व सुषुम्नेच्या आधारे तो साधक आपल्या या जाणीवांना आज्ञाचक्रापर्यंत स्थिर करतो. येथे "गुरुरेव परब्रह्म " ही जाणीव दृढ होते. विवेक-वैराग्य त्याच्या अंतरंगात स्थिर होते.
ही चक्रे म्हणजेच साधकाच्या अंतरंगातील शक्तीस्थाने आहेत. ही शक्तीस्थाने कळी स्वरुपात मिटलेली आहेत,अज्ञान दशेत आहेत. साधक जसा जसा आपल्या साधनेच्या बळावर ईश्वरीय तत्त्वाशी ससंवेद्य व्हायला लागतो, त्याच्या अंतरंगातून ईश्वरीय तत्त्वाच्या जाणीवा जशा प्रस्फुटीत व्हायला लागतात तसे या कळीचे रुपांतर एका सुंदर पूर्ण उमललेल्या फुलामधे होते. त्या प्रत्येक पाकळीतून मग ईश्वरीय गंध दरवळतो. तो साधक ईश्वरीय रंगात रंगून जातो. त्याचे हर एक कर्म हे ईश्वराचेच कर्म असते. येथे तो ईश्वराला म्हणजेच गुरुतत्वाला पूर्ण समर्पित होतो. गुरूच पूढे मग अशा समर्पित साधकाला मार्गस्थ करतात व तो साधक शून्य -निःशून्य-महाशून्य या अवस्थेतून सहस्राकार होतो. सहस्रदलातच तो ते ईश्वरीय तत्वाचे अमृतप्राशन करत मोहरुन जातो, परम शांती अनुभवतो.
आता ईश्वराचे शब्द हेच त्याचे शब्द होतात. तो ईश्वरीय भावात रंगून जातो. द्वैतात असून देखील तो अद्वयत्व अनुभवतो. ईश्वर हा मौनातून व्यक्त होतो. तसे हा उन्मनी अवस्थेतील साधक ही मौनातून अद्वैत भावात रममाण असतो. त्याच्या हृदयात एकच ईश्वरीय स्पंद "मी ब्रह्म आहे,
सर्वं खल्विदं ब्रह्म" हा आलेख असतो. त्या ध्येयाने तो पूर्ण ग्रासून जातो. तो अखंड ह्या स्पंदाच्या अनुभूतीतून व्यक्त व्हायला लागतो. त्याचा परिणाम म्हणजे त्याच्या निरस अंधःकार मय जीवनात तेजाचा सूर्योदय होतो. तो साधक ईश्वरीय तत्त्वाशी इतका एकरुप होतो की आता त्याच्या अंतरंगात द्वैत भाव उरत नाही. ईश्वराच्या व त्याच्या जाणिवा एकरुप झालेल्या असतात. त्याला स्वतःचे वेगळे अस्तित्व उरत नाही. तो ईश्वरच होऊन जातो.
जसे विष्णू व देवी लक्ष्मी (विष्णुप्रिया)हे सदैव एकरुप असतात, तसेच तो साधक आपल्या अंतरंगातून ईश्वराशी एकरुप झालेला असतो. जसे विष्णू-लक्ष्मी हे सदैव एकरुप असतात तसेच हा साधक आपल्या अंतरंगातून हे "शिव-शक्ती समावेशन"अनुभवत असतो. हीच साधकाची "अद्वैत अवस्था" या काव्यातून स्पष्ट केली आहे.
काव्य रसग्रहण : जयंती यारगोप
( दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे.)
एकांती
मी जाऊन बसलो, हृदयाच्या एकांती ! तव सत्य सापडले, मज या अवनीवरती !!
मी स्पर्शित होतो, भाव भावना येथे ! दुःख मूळ जे, ग्रासित होतो तेथे !
मी शोधित होतो सुख... या जीवन पुष्पावरती !! दुःख परागची ते, चिकटत होते मम पंखा वरती !
मी प्राशीत होतो, गन्ध-रस तो जेंव्हा ! नकळत तिरके काटे, बोचत होते तेंव्हा !!
रक्ताच्या दुःखातुनी, एकांती जाऊन बसलो ! हृदयाच्या अभिसरणातूनी, सत्य बघतचि रमलो..!!
आत्मप्रवासी
स्वामीं स्वरूप स्वानंद
आध्यात्मिक रसग्रहण
या काव्यातून कवी आपल्या आध्यात्मिक मार्गाचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी ते एका भुंग्याचे उदाहरण देतात. भुंगा जसा पूर्ण एकाग्र होऊन फुलातील रस शोषून घेतो. ते घेताना त्याला फुलाचे काटे टोचतात, तरी तो एकाग्र चित्ताने त्या फुलातील रस शोषून घेतोच. त्याप्रमाणेच प्रत्येक साधक आपली साधना करताना अनेक संकटांना सामोरे जात असतो. त्याला भौतिक दुःखांचा सामना करावा लागतो. त्याच्या इच्छा वासना त्याच्या साधनेच्या आड येतात. त्याची मानसिक तडफड सुरु असते. पण गुरूंच्या मार्गदर्शनातून तो आपले मार्गक्रमण करीत असतो.
येथेच त्याच्या निष्ठेचा, त्याच्या श्रद्धेचा कस लागतो. त्याला गुरूवाक्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून गुरूप्रित्यर्थ समर्पित भाव ठेवावा लागतो. तो शाश्वत सुखाच्या शोधात असतो पण अज्ञान दशेत असल्याने दुःखच वाट्याला येते.
गुरूच्या आशिर्वादातून त्याला सोहम साधनेची खुण समजते. "मी ब्रह्म आहे, सर्वं खल्विदं ब्रह्म" हा बोध त्याला आपल्या अंतरंगात जागृत करायचा असतो. तो साधना करत असतो. ही साधना कुठे बाहेर नाही तर स्वतःच्या अंतरंगातून करायची असते. त्यासाठी तो आपल्या हृदयाच्या एकांतात शिरतो, म्हणजेच आपले आध्यात्मिक हृदय जे आहे (मन,बुद्धी,चित्त, अहंकार),त्याच्या आधारे तो आपली साधना सुरु करतो.
नाभीपासून ब्रह्मरंध्रात, सोहम भाव स्थिर करायला लागतो. मनाची एकाग्रता साधत, तो अग्रबुद्धीच्या जाणिवेतून मन-बुद्धीचे ऐक्य साधतो. येथे त्याच्या अंतरंगात विवेक , वैराग्याच्या जाणिवा स्थिर होतात व चित्त शुद्धी साधली जाते. त्याच्या इच्छा, वासना, त्याचा अहंकार गळून पडतो व तो आपल्या हृदयातील गुरुतत्वाशी एकरूपता साधतो. त्याला आत्मज्ञान झालेले असते. तो गुरुवाक्याचा अनुभव घेत त्यात रममाण होऊन जातो.
हाच त्या साधकाचा सोहम साधनेचा प्रवास आहे. हाच मन पवनाचा अंतरंगातून केलेला प्रवास आहे जो एकांती बसूनच करायचा आहे.
ईश्वर हा निर्गुण आहे ,म्हणूनच ईश्वराचा शोध ही अंतरंगातून करायचा आहे, एकांतात बसून करायचा आहे. साधना ही एकांतात करायची आहे. ईश्वराचे प्रेमस्वरूप स्वतःच्या अंतरंगातून ओळखून लोकांतात येऊन त्याची मुक्त उधळण करायची आहे. हेच ह्या एकांतात केलेल्या साधनेचे फलित आहे.
काव्य रसग्रहण : जयंती यारगोप
( दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे.)
चंद्र पृथ्वी मनोगत
आकाशाला मिळण्यासाठी,
क्षितिजा चालली धरा ।
फिरून फिरून अज्ञ जाहली,
समजूत काढा जरा ॥
रवी बिंबा कडे पाहुनी हसते,
म्हणे उगा तापसी असा ।
एक्या जागी स्थिर राहुनी,
का रे मलाच त्रासी सदा ॥
चंद्र कोवळा माझा मुलगा, सर्व जाणतो माझ्या दुःखा । आई म्हणुनी लाघव करतो, आडोशाला रात्र काढतो ।
मायेच्या त्या मुग्ध गारवा, भरतीच्या त्या लाटा मधुनी । ओढ देऊनी जलास भारी, मलाच रे कुरवाळी ॥
सूर्य नव्हे हा पिताच माझा,
नकोस त्रागा करूस त्याचा ।
तोच जागवी सर्व जीवांना,
परी, तुझाच घेई आधारा ॥
हळूच माझ्या कानी कुंजूनी,
क्षितिजाच्या त्या भ्रमा बोलुनी ।
आकाश रूपे मला दाखवुनी,
कैसे अज्ञाना घालवितो ॥
मम वृत्तींच्या सूक्ष्म जाणिवा, विशालतेच्या अनंत भावना । भाव विभोर मी, ब्रह्मची आता, दिव्योन्मेषी फिरते ॥
चंद्र न हा गुरुच माझा, मलाच वेष्टी सदा सर्वदा । शीतलता तव आशीर्वादा, घेऊनी मुग्ध जगते अता ॥
आत्मप्रवासी
स्वामीं स्वरूप स्वानंद
आध्यात्मिक रसग्रहण
हे काव्य एका वेगळ्या स्वरूपात मांडले गेले आहे. एका कौटुंबिक पार्श्वभूमीवर पृथ्वी व चंद्राचे मनोगत व्यक्त केले आहे. माय लेकाच्या संवादातून हे काव्य बहरले आहे.
येथे पृथ्वी चंद्राजवळ आपली व्यथा व्यक्त करीत आहे. ती म्हणते की, मी इतकी फिरते, क्षितिजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते पण माझ्या अज्ञानामुळे मला ते आकाश सापडत नाही. पृथ्वी ही पंचमहाभूतांमधील सर्वात जड तत्व आहे. त्यामुळे तेथे पूर्ण अज्ञान आहे.
ती चंद्राजवळ तक्रार करते की, हा सूर्य बघ. एका ठिकाणी स्थिर राहून तो आपला प्रकाश सर्वत्र पसरवतो आहे. आपल्या उष्णतेने मला तापवतो आहे ,त्रास देतो आहे. येथे सूर्याला परब्रह्माची उपमा दिली आहे. कारण तो स्थिर आहे व स्वयं प्रकाशित आहे. पृथ्वीला प्रकृतीची उपमा दिली आहे. ती माते समान सर्व सोसून परत मायेने सर्व जीवांचा सांभाळ करते. पृथ्वी माता पुढे चंद्राला म्हणते, तू माझा मुलगा आहेस. तू माझे सर्व दुःख जाणतोस. म्हणूनच एक आई म्हणून मी तुझ्यावर प्रेम करते. माया करते. तू ते सर्व जाणतोस म्हणून माझ्या आडोशाला राहून मला साथ देतोस. तुझा मुग्ध करणारा गारवा, तुझ्या मुळे होणा-या भरती-ओहोटितून तू जे जलतत्व बांधून ठेवतोस , त्यानेच मला थंडावा मिळतो. शांतता मिळते. तुच मला तुझ्या शांत , शीतल प्रकाशातून कुरवाळतोस ज्याने मी सुखावते.
या तक्रारीवरून एक पुत्र आपल्या मातेला समजावतो आहे. चंद्र पृथ्वीला म्हणतो आहे की, अगं हा सूर्य नव्हे, हा माझा पिता आहे. तू त्याचा त्रागा करु नकोस. ते तुझ्या मार्फतच तुझ्या आधारानेच सर्व जीवांना जीवन प्रदान करतात. सर्वांना उर्जा देऊन त्यांना जिवंत ठेवतात. हे सत्य चंद्र पृथ्वीच्या कानात सांगून तीला असलेली क्षितिजाची भ्रामक कल्पना घालवून तीला सत्य आकाश स्वरूप म्हणजे ब्रह्म स्वरुप दाखवतो. तीचा भ्रम, तिचे अज्ञान घालवतो. पृथ्वीलाही आता सूर्याचे म्हणजेच ब्रह्म स्वरुपाचे ज्ञान होते. तिच्यातील सूक्ष्म अज्ञानी वृत्तींचा नाश होतो व तीला विशाल,अनंत असे ब्रह्म स्वरुप समजते. ती भावविभोर होऊन ब्रह्म जाणिवेशी एकरुप होते. तिच्यातील उठणारा प्रत्येक उन्मेष हा दिव्यत्वाचा अनुभव घेऊनच फिरतो.
येथे पृथ्वीच्या जाणिवांमधे परिवर्तन घडून येते. तीला हे ज्ञान चंद्रामुळे झाले असल्याने ती चंद्राला आपला पुत्र न मानता त्याला गुरु स्थानी बघते. तो गुरु जो नेहमी तीला त्याच्या शितलतेचा आशिर्वाद देत असतो. पृथ्वी देखील आता त्याच्या कृपाशिर्वादाने मुग्ध होऊन आपले जीवन जगू लागते.
या काव्यातून हे ही दाखवून दिले आहे की एक गुरु आपल्या शिष्याला आत्मज्ञाना पर्यंत पोहचवतो पण त्यासाठी वयाची नाही तर पात्रतेची गरज असते. शिष्याच्या वयापेक्षा लहान ही गुरु असू शकतो फक्त त्याला ओळखता आले पाहिजे. त्याला पूर्ण समर्पित होता आले पाहीजे. ह्यातच प्रत्येक जीवाचे कल्याण आहे.
काव्य रसग्रहण : जयंती यारगोप
( दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे.)
अनुबंध
फुलण्यात माझ्या धुंद होऊनी, मजला मीच बघत बसे ! रंग रंगातूनी अधीक मोहक, मीच मजला करीत असे !!
जड दगड तोही मजला, आधार होऊनी हात धरे! मीच त्याचे वस्त्र होऊनी , शृंगार साज चढवीत बसे !!
बंध आमूचा मुळातूनी, एकभाव फुलवीत असे! तोच तो मुग्ध होऊनी , माझ्यातुन उमलत दिसे!!
त्याचेच रंग ते, बीज होऊनी मी दिसे ! दगड तो ही पहाड बनुनी, मज जीवनी आधार असे !!
फुलाच्या त्या गंध कोशी, अनुबंध तो वसत दिसे! एकरूपतेत विविध होऊनी, सुसंवाद तो घडत असे !!
मीच माझ्या जीवनी , विचार हा करीत नसे ! माझ्या त्या कोषा मधूनी , ईश्वर बघ तो डोलत दिसे !!
आत्मप्रवासी
स्वामीं स्वरूप स्वानंद
आध्यात्मिक रसग्रहण
पावसाळ्यात जसे आपण बघतो की एक सुंदरशी नाजूक वेल, डोंगराच्या कडेकपारीत घट्ट रुजते, फुलते, बहरते व आपला सुगंध सर्वत्र पसरवते. आपण बघतो की मोठे वृक्ष वादळात उन्मळून पडू शकतात पण ही छोटीशीच वेल त्या कड्याला घट्ट धरून ठेवते. हाच त्या लता व डोंगर कड्याचा प्रेमळ अनुबंध असतो. हेच उदाहरण देत कवी येथे स्वतःचा व आपल्या गुरूचा (आत्म्याचा,ईश्वराचा) प्रेमळ अनुबंधाचे वर्णन करत आहेत. ते सांगतायेत की गुरूच्या मार्गदर्शनातून साधना करत(सोहम साधना) जशी जीवनाची वाटचाल सुरू होते व त्यातून अनेक अनुभव घेत मी स्वतःला ,आत्मस्वरूपाला समजून घेतो व समृद्ध होतो तेव्हाच हा अनुबंध घट्ट होतो. ह्या मार्गावरचा दगड म्हणजे कुटस्थ ईश्वराचे गुरू स्वरूप हाच माझा आधार आहे. तोच माझा हात धरून मला चालवत आहे. मी त्याच्या शेल्याचे टोक इतके घट्ट धरले आहे की मी त्याचे वस्त्रच झालो आहे. मी त्याच्याच रंगात रंगून गेलो आहे. आमच्यात इतकी एकरूपता आहे की माझ्या अंतरंगातून त्याचे षट्गुण (श्री, ज्ञान,औदार्य, वैराग्य, ऐश्वर्य) उमलत आहेत, प्रगट होत आहेत. त्या ईश्वराची खूण (मी ब्रह्म आहे, सर्वंम खल्विदं ब्रह्म) माझ्या अंतरंगात बीज बनून वसते, रुजते. ते आत्मस्वरूप जाणल्यावर त्याच्याशी जो अनुबंध निर्माण होतो तोच माझ्या जीवनाचा आधार असतो, तोच जीवनाला आकार देतो. मी माझ्या आत्मस्वरूपाशी इतका एकरूप आहे की त्याचे गुण (एकरूपता, विविधता, सुसंवाद) तेच माझ्या व्यक्तीमत्वातून प्रगट होतात. हा अनुबंध इतका घट्ट आहे की तो ईश्वरच त्याच्या या गुणांची उधळण माझ्या व्यक्तीमत्वातून करतो व ते बघत असताना स्वतःच्या लीलेवर मंत्रमुग्ध होऊन डोलतो व स्वतःचा आनंद व प्रेम व्यक्त करतो.
हरी ऊँ तत् सत्...
काव्य रसग्रहण : जयंती यारगोप
( दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे.)
दिगंतरी
तूच मजला घेऊन जा रे,
हृदयाच्या अंतरी!
अंतरातुनी सहज जाणीवे,
आत्मप्रकाशी दिगंतरी!!
तूच तो रामदूत ना रे,
प्राणासी तू विशुद्ध करी!
ज्ञानातून तो स्वयें प्रकाशे,
भक्तीतून तू उड्डाणं करी!!
एकादशी या एकच भावे, गुरुस्वरूप ते भावतसे! विटी उभ्या त्या रंग भरोनी, पांडुरंग तो विशुद्ध दिसें!!
पुरुषोत्तमही तूच का रे... क्षरा-क्षरी तू पार दिसें ! सोहम सिद्धे स्वरूपानंदे, स्वानंदी मी रमत असे!!
आत्मप्रवासी
स्वामीं स्वरूप स्वानंद
आध्यात्मिक रसग्रहण
या काव्यातून स्वामी स्वरूप स्वानंद हे आपल्याला आपल्या गुरूस्वरूप जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. हे गुरूतत्व आपल्या चिदाकाशात स्थित आहे ,ते क्षितिज आपल्याला शोधायचे आहे व ते शोधण्याचे मार्ग या काव्यातून सांगितले आहे.
ते सांगतात की ब्रह्मरंध्रात स्थित असलेले आत्मतत्त्व हे सदच्चिदानंद स्वरूप आहे.आपल्या साधनेतून आपल्या जिवाला या आत्मतत्त्वाशी एकरूपता साधायची आहे.त्यासाठी ते प्रथम हनुमंताला पूर्ण समर्पित होऊन प्रार्थना करतात की तूच मला मार्गदर्शन करून माझ्या अंतरंग चतुष्टयची ओळख करुन देतोस. तूच माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात मला घेऊन जातोस ज्याच्या आधारे मी माझ्या मन-बुद्धीच्या जाणीवांना अग्री करून माझ्या चित्तापाशी त्यांचे समत्व साधतो ,व त्यातूनच चित्ताची शुद्धी होते. चित्त शुद्धी होते तेव्हा माझ्यात विवेक व वैराग्य बाणवले जाते व मी आज्ञाचक्रापाशी तुझ्या जाणिवांशी एकरूप होऊन जातो.येथे मला माझ्यातील आत्मप्रकाश दिसतो व या शून्य अवस्थेत, मी माझ्या क्षितिजापर्यंत पसरलेल्या आत्मप्रकाशात न्हाऊन निघतो,तुझ्याशी एकरूप होऊन जातो.
हनुमंत हाच मार्गदर्शक असल्याने हनुमंताला ही गुरू स्थानी मानतात व त्याचे स्मरण करून म्हणतात की तूच तो रामदूत आहेस, तो प्राण आहेस जो सतत नाभीपासून ब्रह्मरंध्रात फिरत आहे व हा रामदूत ,सोहम साधनेतून त्या प्राणाला विशुद्ध चक्रापाशी गुणसाम्य अवस्थेत आणतो. येथे आत्मज्ञान होते व साधकाला आज्ञाचक्रापाशी गुरूतत्वाची जाणीव होते व तो त्या ज्ञानप्रकाशात बुडून जातो. ह्या विशुद्धचक्रापाशी त्याला हनुमंताच्या रूद्र स्वरूपाची ओळख होते व हा रूद्र त्याच्या उड्डाणातून साधकाला त्याच्यातील आत्मतत्व, शिवतत्वा पर्यंत नेऊन पोहोचते करतो. येथे "ऊँ रुद्राय शिवाय रामदूताय" ह्या मंत्रजपातून शिवतत्त्वापर्यंत म्हणजे गुरूपर्यंत, आपल्या क्षितिजापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला आहे.
पुढे ते सांगतात की एकादशीला जसे भगवान विष्णूची उपासना केली जाते व त्या तिथीला अनुसरून जसे साधक आपल्या पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रीय व एक मन असे अकरा तत्त्वांना आपल्या ताब्यात ठरतो, त्यावर विजय मिळवतो तेव्हा तो त्या विष्णूशी म्हणजेच आपल्या औटपिठी विटेवर उभा असलेल्या विठ्ठलाशी ,म्हणजेच आपल्यातील पुरूषोत्तमाशी एकरूप होतो,जे साधकाला गुरुस्थानी आहे. हा पुरूषोत्तम म्हणजेच कृष्ण आहे जो आपल्या अनेक रंगांनी ह्या विश्वात अघटित घटना घडवत आहे. साधक त्याच्या ह्या रंगात रंगून कृष्णमय होऊन जातो.
शेवटी साधक सांगतात की तो पुरूषोत्तम हेच ते आत्मतत्त्व आहे,तेच गुरूतत्व आहे जे क्षर अक्षराच्या परे सदच्चिदानंद स्वरूपात आपल्या चिदाकाशात स्थित आहे. ते प्रकृतीच्याही परे निरंजन अवस्थेत, अलिप्त, अनासक्त अशा स्वरूपात आहे.
स्वामी स्वरूप स्वानंद शेवटी सांगतात की ह्या सोहम साधनेतून ही सिद्ध अवस्था प्राप्त करून मी आपल्या गुरूंच्या अंतःकरणात म्हणजेच स्वामी स्वरूपानंदांच्या हृदयात राहून स्वरूपाच्या आनंदात रममाण होत आहे.
अशा तर्हेने स्वामी आपल्या अंतरंगातील गुरूतत्वाचा शोध घेण्याचा व तेथपर्यंत पोहोचण्याचा म्हणजेच आपल्या क्षितिजापर्यंत पोहोचण्याचा मार्ग ह्या काव्यातून स्पष्ट करतात.
काव्य रसग्रहण : जयंती यारगोप
( दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे.)
अघटित विश्व
अघटित विश्वे घटी निर्मुनी,
घटी घटी त्या स्वयें बांधुनी।
कटी करी त्या विटी उभारुनी,
तुझे पटुत्वची विश्वे मोहरी।।
तंत्रे तुझिया यंत्रे बनवुनी,
नियत मंत्री त्या सुत्रे बांधुनी।
चित्र-विचित्रे चित्रित करुनी,
विश्वे सुनियंत्रित करसी।।
सूक्ष्म शक्ती त्या सूक्ष्म विचारे,
सूक्ष्मतर त्या सूक्ष्मा विस्तारे।
अती सूक्ष्मी त्या सर्व प्रसवे,
नाम-रुपी त्या सर्व आधारे।।
सत्य कृत्य ते असत्य भासूनी,
अमर्त्यास ते मर्त्य जाणूनी।
प्रकृतीतच विकृती भरुनी,
ज्ञाना अज्ञाना फुलवी।।
शुद्ध स्फटिकी त्या अरूपा जाणूनी,
रंगी तव त्या रूपा भारुनी।
विश्वरूपी त्या स्वरूपा समजूनी,
ज्ञानी, आत्मरुपा पाहतो।।
डॉ सुधीर पांडे
दिव्योन्मेष सत्संग
हे क्षणानो पुण्य द्या
हे क्षणांनो पुण्य व्हा,
जीवनी माझ्या समृद्ध होउनी,
ईश्वराला भेटवा...।।
हे क्षणानो पुण्य द्या....
जीवनी माझ्याच असती
विखुरलेल्या भावनांची।
अपेक्षतेला बाजू करोनि,
नैष्कर्मी त्या सजवा....।।
अज्ञान हे मलाच ग्रासी,
पसरलेल्या जगास मानी।
अंधार तो सावरोनी,
सत्य ते ची दाखवा.....।।
अहंकार हे माझ्या स्वरूपी,
विसरल्या जीवास मानी।
"मी" त्या पूर्ण मावळी,
आत्मरुपा त्या दर्शवा...।।
बुद्धीस त्या ज्ञानी जीरोनी,
भटकल्या मनास भरोनी।
चित्तास त्या शुद्ध करोनि,
परब्रह्म भेटावा....।।
हे क्षणांनो पुण्य द्या...।।
डॉ सुधीर पांडे
दिव्योन्मेष सत्संग
प्रार्थना
हे पांडुरंगा.....!!
तुझ्या अरूपाच्या रूपातील एक ज्ञानयुक्त चैतन्य मय जाणीव माझ्यात उन्मेषीत कर!
तुझ्या सत्-चित्-आनंद स्वरूपातील अनंत, परमप्रेमस्वरूप या ब्रह्माण्डा मध्ये प्रवाहीत आहे.
हे माउली..!
या परमप्रेम स्वरूपातील प्रेमाचा एक थेंब माझ्या अंतःकरणात गोठून जाऊ दे. त्या एका थेंबाच्या विशुद्ध स्फटिक स्वरूपातून स्पर्शीत होणारे माझे समग्र व्यक्तिमत्व ज्ञानाच्या जाणिवेतून पुलकित होईल.
हे पांडुरंगा....
माझ्यातील स्थूल,सूक्ष्म, कारण तथा महाकारण देहातील परिवर्तन स्थायी स्वरूपात मीच बघेन...!
माझ्यातील सर्व अज्ञान जाणीवांचे स्वरूप पालटून जाईल व तेथे ज्ञानाचा प्रकाश प्रस्फुटित होऊन धवल प्रकाश कोंदाटेल..तुझ्यातील अतिचेतन स्पर्शाने माझ्यातील परिवर्तन तूच घडव.
हे विठ्ठला, दयाघना.. तूच माझा राम व तूच माझा कृष्ण....तूच तर निर्गुण, सद्गुरु स्वरूप परब्रह्म!!
अनंत कोटी ब्रह्माण्डाचा तूच तर नायक...या सम्पूर्ण विश्वाला आपल्या केवळ दिप्तीने तू प्रभावित करतोस.....
हे विश्वातीता, प्रार्थना एकच.......
तुझ्या या "एकल्या-एक-दशेत" मला समाविष्ट कर. मला तू कर!!
मी माझे मावळो सर्व,
तू तुझे उगवो अता।।
डॉ सुधीर पांडे
दिव्योन्मेष सत्संग
देवघरातील पूजा
असा कसा तू येतो,
आणि भाव लावुनी जातो।
देवघरातील फुलां मधुनी,
हळूच बोलत असतो।।1।।
मुग्ध फुलांच्या स्निग्ध रंगी तू,
पराग होउनी वसतो।
सुक्ष्मा मधुनी गंध उधळुनी,
बेरंगी तू सजतो।।2।।
प्रतिमेच्या त्या मूर्त स्वरूपी,
अमूर्त तू कसा असतो।
जसा दिससी तसाच नससी,
अनुभव ज्ञाना येतो।।3।।
गणेश रूपे जरी बांधिले,
ज्ञान स्वरूपी अससी।
देवघरातून जरी बसविले,
मूलाधारी वससी।।4।।
अन्नपूर्णा तू जरी भासे,
शक्तीरूपीणी अससी।
जगदम्बाच स्वरूप तव ते,
अपरे मध्ये दिससी।।5।।
अज्ञ स्वरूपी माये भरुनी,
मलाच दूर करसी।
परम प्रेम तव चित स्वरूपा,
कोषी लपविसी।।6।।
कृष्ण रूपा तव प्रेमे भावे,
पूजन त्वा करतो।
विष्णू स्वरूपी अतिमानसी,
पुरुषोत्तम तू असतो।।7।।
देवघरातील तव स्वरूपा,
कसा जाणू मी आता।
उदबत्तीच्या द्वैत सुगन्धी,
अद्वैत्वा समजू कसा आता।।8।।
निरंजनाच्या ज्योती मधुनी,
आर्त भावी पूजितो।
कापराच्या मम क्षणिक जीवनी,
ज्ञाना-विज्ञाना भावतो।।9।।
डॉ सुधीर पांडे
ज्ञानेश्वरी सत्संग
सत्य क्षण ते आले
शब्दांच्या फटी मधुनी क्षण गेले,
हसतच गेले निसटत गेले!
“नामाच्या” बांधा मधुनी क्षण आले,
हसतच आले एकरूप ते झाले!!
जीवनाच्या चाली मधुनी क्षण गेले,
रडतच गेले हरवत गेले!
देवाच्या सख्यत्वातुनी क्षण आले,
फुलतच आले, खुलवत आले!!
मी-माझ्या संकल्पातुनी क्षण गेले,
रागावुनी गेले, कोमेजुन गेले!
“मावळतीच्या” स्फुटा मधुनी क्षण आले,
मोहरून गेले, सत्य बांधुनी गेले…
सत्य दाखवुनी गेले…!!
डॉ सुधीर पांडे
(दिव्योन्मेष सत्संग)
अवधुता रे तव रूपासी
अवधुता रे तव रूपासी,
पाहुनी मी गमतो।
गुरुरुपे रे , तुज स्मरोनि,
भाव पुष्प ठेवितो।।
अचिंत्य तू रे , चिंतनी तव,
जीवनी फुलतो।
विश्वातीता तुज आठवोनी,
मज समर्पित करतो।।
‘संसार तम’, तू रे सूर्या,
“रु”कारातुनी तेज दावीसी।
“गु”कारच त्या माझ्या रूपा,
विज्ञानी करिसी।।
ज्ञानस्वरूपा हे गुरुदेवा,
अधिक ते, नकळे आता।
त्रिगुणातीता, विशुद्धरूपा,
व्योमातीता निरंजना।।
भावातीता, ध्यानी मजला,
संसारार्णवी सेतू सजवुनी।
चिदाकाशी स्फटीक तव रूपा,
आनंदी त्या स्थिर करी।।
अचल तू , तर चलहि तुही,
दूर असोनि जवळी राही।
मम हृदयी त्या वास करोनी,
वैराग्यातून विवेक साधी।।
तूच ब्रह्म तू, परब्रह्म तू,
परमेश्वर तू, सद्गुरूच असशी।
मम जीवाला, आत्म्या मधुनी,
तव स्थान ते दावीसी।।
डॉ सुधीर पांडे
दिव्योन्मेष सत्संग
शिव-विष्णू हृदय
शिव हृदयी त्या विष्णू वसे,
विष्णू हृदयी त्या शिवची असे।।
रुद्राच्या त्या भावा मधुनी,
श्वास सतत तो चालत असे।
सुषुम्ने मधुनी लय साधुनी,
चन्द्र-सूर्यही लोपतसे।।
शिव हृदयी त्या राम वसे,…
आज्ञाचक्री वेध घेऊनी,
विवेक-वैराग्ये तो उमटे।
सूक्ष्म-सूक्ष्मतम जाणिवेतुनी,
गुरु स्वरूपी तोचि असे।
शिव हृदयी त्या राम वसे..
आज्ञाचक्री श्यूनी पावुनी,
शुद्ध जीवनी राम वसे।
निःश्यून्याच्या भुमिके मधुनी,
विशुद्ध जीवनी कृष्ण असे।।
शिव हृदयी त्या कृष्ण वसे…
राम वसे तो कृष्ण दिसे,
कृष्ण दिसे तो राम नसे।
महाश्यूनी त्या विश्व बीजाते,
राम-कृष्ण हि हरीची असे।।
शिव हृदयी त्या विष्णू वसे,
विष्णू हृदयी त्या शिवची असे।।
डॉ सुधीर पांडे
दिव्योन्मेष सत्संग
अश्रू
अश्रूंच्या दवबिंदूतून
भाव जव उठतो,
आक्रंदित हृदयाच्या
शब्दातून बोलतो।
काळाच्या वळणावरती
अश्रुबिंदू तो आला,
चिंचोळ्या मार्गातुनी
हृदय हेलावुनी गेला।
तो काळ हि क्षण क्षण आला
त्या अश्रूच्या दवबंदुला,
हलकेच पुसुनी सरला
प्रश्न ठेवोनी गेला।
हे हृदय का ते हलले?
डोळ्यात अश्रू का थबकले?
हा काळ येऊनि गेला,
मम भावना आक्रन्दूनी गेला।
हा काळच चालत आला,
मम दुःख घालवुनी गेला,
मी आधीन कुणाच्या असतो
दैवाधिनच मला जाणवतो।
जे दुःख, दुःख म्हणुनी आले,
ते भ्रमची ठरतच गेले,
अज्ञाना मधुनी माझ्या
सुख-दुःख भोगीत आले।
मी जाणुनी “स्व” ला जगतो
मी ईश्वर म्हणुनी असतो,
त्रयस्थ होऊनि बघतो
अश्रुतही आनंद सजतो।
डॉ सुधीर पांडे
दिव्योन्मेष सत्संग
अध्यात्म वाट
हा कोण चालला घेऊन ओझे खांद्यावरती,
कुठे जायचे कसे जायचे या रस्त्या वरती।
अज्ञानातून मार्ग काढित ज्ञान ची राहे पुढती।।धृ।।
ओझ्या खाली दबत, चाल जाहली मंद,
तरी मनातून उठतच होता एकच आक्रन्द।
का नच मज मजला, न कळे हे आता,
का दूर राहिला छिद्रा मधील किरण तो आता।
तो किरण अवचित होता या स्थानी,
मम चित्ताला, स्पर्शित करुनी जाई।
तो प्रकाश होता, शांत-स्वस्थ गुरुमध्यस्थ,
जणू मला करतच होता निश्चित मार्गस्थ।।
गुरू वचने विश्वास ठेवूनि जगणे,
ओझे रिते करीतच आता क्रमणे।
तो येईल आता वाट पाहतो आता,
विश्वासें बघ उगवेल नव पहाट हि आता।
मी चालत होतो श्वासा श्वासा मधुनी,
उतरत होतो क्षण क्षण कर्मा मधुनी,
मी होऊ पाहिले विलग प्रपंचामधुनी,
तव, आठवणीने दाटून आलो हृदया मधुनी।।
क्षण एकचि राहे सदैव माझ्या सामोरी,
भाव एकचि राहो तुला न विसमरोनी।
मम कर्मात जडावा तव प्रेमाचा सुगन्ध,
हृदयातून जुळवा तुझाच रे अनुबंध।
मम बुद्धीने जाणून घ्यावे तुज सर्वस्व,
मनातीत होऊनि बुद्धीने गमवावे वर्चस्व।।
श्वासाच्या रोधाने मन-बुद्धी व्हावी भ्रुमध्यस्थ,
सोहम च्या अजपातुनी गाठावा कुटस्थ।
विहंगमातुनी थेट लक्षावे ते अलक्ष्य,
हेचि साधन करीत असावे बाकी ते दुर्लक्ष्य।
तत्परतेने लक्ष असावे चिदाकाशी अव्यक्त,
हेच सांगे गुरू तो मजला रहा साधनी आसक्त।।
डॉ सुधीर पांडे
दिव्योन्मेष सत्संग
शोध आनंदाचा
दुःखाच्या कारणासाठी,
आनंद शोधित होतो,
वृतींच्या हिंदोळ्यावरती,
आघात मांडीत होतो!
सक्तीच्या माध्यमातून,
देवाला पूजित होतो,
कर्माच्या मार्गातुनी,
दुःखच जोडित होतो!!
अनुतापाच्या अग्निवरती,
दुःख भाजुनी जगलो,
अनासक्तीच्या सुता मधुनी,
पूजा बांधीत रमलो!!
वृतींच्या दुर्लक्षातुनी,
आनंद वहातच आला,
जव दुःख दमले होते,
आनंद डोहातच होता!!
डॉ सुधीर पांडे
दिव्योन्मेष सत्संग